श्री
काशी दर्शन आटपून आम्ही परत आलो तेव्हा संध्याकाळचा अंधार दाटून आला होता पण त्या दिदिंकडे जाण्याशिवाय पर्याय पण नव्हता,मामाला कळवू म्हटले तर त्याचा फोन नंबर असूनही जागोजागी फोन करता येतील अशी काहीही व्यवस्था नव्हती.दिवसभराच्या बस प्रवासाने आम्ही तिघही खरतर कंटाळून गेलो होतो पण ticketच्या पैशावर सहज पाणी सोडावे अशीही आमची परिस्थिती नव्हती.पुन्हा बस मध्ये बसलो अंदाजे दीड तासाच्या प्रवासानंतर आम्ही उतरलो ती जागा अजिबात आकर्षक नव्हती.रातकिड्यांचे आवाज, मिणमिणत्या उजेडात एक छोटीशी चहापानाची टपरी.इकडे तिकडे नजर टाकल्यावर दूरवर एक सायकलरिक्षा उभा दिसला.आमच्या जवळचा पत्ता त्याला सांगितल्यावर त्याने मानेनेच रिक्षात बसायची खूण केली.फक्त रिक्षाच जाऊ शकेल एव्हढी जागा अन दुतर्फा उंच वाढलेली उसाची शेतं ,वर आकशात पौर्णिमेचा चंद्र लाखो चांदण्यांना घेऊन अमृत प्रकाशाची मुक्त उधळण करत होता हाच काय तो जिवंतपणाचा अन आमचा संबध बाकी सगळाच प्रकार हिंदी भयपटात असतो तसा प्रकार.रिक्षाला लावलेया घुंगरांचा आवाज त्या निर्मनुष्य जागेत अजिबात आनंद देत नव्हता. रात्रीचा गारठा वाढत चाललेला ,हळूहळू आम्हाला त्या चांदण्याची सुद्धा भीती वाटू लागली.आम्ही केव्हा मनातल्या मनात रामरक्षा म्हणू लागलो ते आम्हालाही कळले नाही.आम्हाला खूप बोलायचे असून एकही शब्द बोलता येत नव्हता इतकी विचित्र शांतता सगळ्या परिसरात होती.
सौ.उषा.
No comments:
Post a Comment